महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली

     
http://realgodofindia.blogspot.in/
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यापासून कोसो दूर ठेवण्यात आल्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करता यावा. त्यांची संस्कृतिक प्रगती करता यावी म्हणून बहिष्कृतहित कारणी सभेची स्थापना जुलै 1924 मध्ये केली होती, या सभेच्या माध्यमातून माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी प्रथम त्यांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली. या सभेतर्फे मुंबईत मोफत वाचन कक्ष सुरु करण्यात आले. या शिवाय महार हॉकी क्लबची स्थापना करुन या समाजातील तरुणांना खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची संधी उपलब्ध करुन दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1928 मध्ये बहिष्कृत समाज शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉ. बाबासाहेबांनी 1928 मध्ये दोन वसतीगृह काढून शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली हेाती. त्यांनी प्रत्येक जिल्हयातील कार्यकर्त्यांनी जिल्हयाच्या ठिकाणी वसतीगृह स्थापन करुन अस्पृश्य  मुलांच्या हायस्कूलच्या शिक्षणाची मोफत राहण्याची व जेवणाची सेाय करावी. त्यामुळे गरीब व होतकरु अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल, असे आवाहन करताच अनेक जिल्हयात अशी वसतीगृह सुरु झाली.त्यामुळे आज दलित समाजाचा जो शैक्षणिक विकास झाला त्याचे मूळ या वसतीगृहांत दिसून येते.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईमध्ये 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कनिष्ठ मध्यम वर्ग आणि अनुसूचित जाती- अनुसूचित जमाती  (एससी-एसटी) साठी उच्च शिक्षणाची उत्तम सोय निर्माण करण्याबरोबरच आदर्श शिक्षण संस्था त्यांना निर्माण करावयाची होती. पीपल्स एज्युकेशन सोसायटीने 19 जून 1946 रोजी आपल्या पहिल्या महाविद्यालयाचा प्रारंभ केला. मुंबईतील मरीन लाईन मधील लष्कराच्या जुन्या बॅरेक्समध्ये कला व विज्ञान  महाविद्यालय सुरु करण्यात आले. या बॅरेक्स केंद्रीय सरकारकडून लिजवर घेण्यात आल्या होत्या. या महाविद्यालयास सिध्दार्थ कॉलेज ऑफ ऑर्ट ॲण्‍ड सायन्स असे नाव देण्यात आले. डॉ. बाबासाहेबांचा जन्म आताच्या मध्यप्रदेशातील महू येथील लष्करी छावणीत झाला होता. तसाच सिध्दार्थ आणि मिलिंद महाविद्यालयाचा जन्मही छावणीच्या बॅरेक्समध्ये झाला, हा मोठा योगा योग होता.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्यानं औरंगाबाद आणि मराठवाडयाशी संबंध 1934 मध्ये आला. बाबासाहेब आणि त्यांच्या काही मित्रांनी 1934 मध्ये दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यास भेट दिली हेाती. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी आणि त्यांना किल्ल्यातील हौदावर ताजे तवाणे व्हावे म्हणून हात पाय धुतल्याने हौद बाटविला म्हणून मुस्लिमांनी ‘धेड फार माजलेत, स्वत:ची पयरी विसरलेत’ म्हणून गोंधळ घालून, शिव्या देऊन अपमानीत केले होते. त्यावेळी हैदराबाद संस्थानात सवर्ण हिंदु बरोबरच मुस्लिमांचाही जातीय त्रास अस्पृशांना सहन करावा लागतो., हे बाबासाहेबांनी ओळखले होते. हैदराबाद संस्थानातील अस्पृश्यता संपावयाची असेल तर नव्या विचारांची जन जागृती, प्रबोधना बरोबरच उच्च शिक्षण तेही अस्पृश्यांमध्ये स्वाभीमान आणि अस्मिता जागृत करणारे असावे असा विचार केला. त्यासाठी त्यांनी वेळ मिळेल तसे औरंगाबादला भेटी देऊन अस्पृश्यांच्या बैठका, सभा घेऊन त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. तसेच दौलताबादच्या किल्ल्यास भेट देण्यापूर्वी 10 ऑक्टोबर 1933 रोजी औरंगाबाद येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांचा मुक्काम औरंगाबाद येथील उस्मानपुऱ्यातील  ‘मन्सुर यार जंग देवडीत’ होता तेथे त्यांनी दलित समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.
बाबासाहेबांची औरंगाबाद-मराठवाडयातील जनतेची  दुसरी भेट 1938 मध्ये झाली. यावेळी मराठवाडयात सभा घेण्यास निझामाच्या पोलीसांनी मनाई केल्याने तेव्हा चाळीसगावंच्या हद्दित असलेल्या मकरणपूरयेथे अस्पृयश्यांची परिषद 30 डिसेंबर 1938 रोजी झाली. या परिषदेस खान्देश, मराठवाडयातून मोठया संख्येने दलित उपस्थित होते. ‘‘या निझाम संस्थानात अस्पृश्यांसाठी शाळा नसाव्यात ही नवलाचीच गोष्ट आहे. मी लंडनमध्ये असताना पुष्कळ विद्यार्थी निजामाची शिष्यवृत्ती घेउुन शिक्षण घेण्यास आले होते. परंतु त्यात एकही महार, मांग किंवा चांभार नव्हता. बडोदे –कोल्हापूर संस्थान प्रमाणे हे स्थानिकही वागतील अशी माझी अपेक्षा होती ; परंतु ती फोल ठरली…. … तुम्ही आमच्या रक्ताचे आहात. मी तुमची दु:खे नाहीशी करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही काही गोष्टी जरुर करा. मेलेल्या जनावरांचे मांस खाणे सोडा. गलिच्छ कामे सोडा.  तुम्ही म्हणाल, हा पोटा-पाण्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न काही पोटा-पाण्याचा नाही. अब्रूचा आहे. सर्व जातींची अब्रु, जाईल असे तुम्ही काही करु नका. लोक तुम्हाला ‘धेड’ म्हणतात याची लाज वाटू द्या.’’ असा संदेश बाबासाहेबांनी दिला. त्यामुळे मराठवाडयातील अस्पृश्यांमध्ये परिवर्तनाची नवी चेतना निर्माण झाली.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.