स्रियांनी सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा उपयोग काय केला, आजच्या स्रियांना स्वत:ची अशी ओळख आहे का?

1)स्रियांनी  सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा उपयोग काय केला,
2)फक्त नवर्याची सेवा करायला, संत्संगला जायला, 
3) पोथीपुराणे वाचता यावीत,
4)उपासतापास करता यावेत, वैभवलक्ष्मीची पारायणे करता यावीत 
    पण    याच्यासाठी सावित्रीबाईनी तुम्हाला शिक्षण नाही दिलं.

 आजच्या स्रियांना स्वत:ची अशी ओळख आहे का? स्वत:ची अस्मिता, स्वत:चा स्वाभिमान आहे का? मी नेहमी स्रियांना एक प्रश्न विचारत असतो की, तुम्ही शिकून नवीन काय केलं? सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्ही उपयोग काय केला? तुम्हाला सावित्रीबाईनी शिक्षण दिलं त्यासाठी अंगावर दगड माती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवर्याची सेवा करायला, संत्संगला जायला, पोथीपुराणे वाचता यावीत, उपासतापास करता यावेत, वैभवलक्ष्मीची पारायणे करता यावीत याच्यासाठी सावित्रीबाईनी तुम्हाला शिक्षण नाही दिलं. याच्यासाठी सावित्रीबाईंनी का दगड-माती नाही खाल्ले! याच्यासाठी सावित्रीबाईंनी वाटेल तसा मान-अपमान सहन केला!! कशासाठी केला त्यांनी हा उपद्व्याप? तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून? तुम्हाला पार्लरला जाऊन स्वत:ला नटता यावे म्हणून? ह्या शिक्षित स्रियांनी नवीन काय केलं? दोनशे वर्षापुर्वीही स्री हे सर्व न शिकता, आपल्या, मुलाबाळांना, पतीला, सासू-सासर्याला न्याय देत होती की. न शिकताच सर्व करीत होती तर मग तुम्ही नवीन काय केलं?

सावित्रीबाई फुले यांच्यामुळे गेल्या काही वर्षात स्त्री शिकू लागली.शिक्षण, अर्थार्जन असे टप्पे घेत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारे कसे तिच्या मनासारखे झाले. पण तिचे जळणे, सोसणे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार थंबला का? वर्तमानपत्रातील बलात्काराच्या बातम्या,हुंडाबळी आणि मारहाणीच्या बातम्या ओरडून,किंचाळून सांगताहेत की, स्त्रीचे जळणे अद्याप सुरू आहे. विद्याविभूषित आणि भरमसाठ पगार घेणारी स्त्रीसुध्दा कधीकधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचे पाऊल उचलते. स्वत:ला आधुनिक समजणार्या प्रथितयश अभिनेत्रीनासुध्दा स्त्रीदेहाचे प्रदर्शन आणि कधीकधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही.हे सारे पाहिले की वाटते, आजही स्त्रीचे सती जाणे सुरूच आहे.फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलली आहे.स्त्री खरेच मुक्त झाली आहे का?

मुळात शिक्षण कशाला म्हणतात?  ज्योतिबा फुले म्हणतात, खरे आणि खोटे ओळखण्याची ताकद म्हणजे शिक्षण , सत्य आणि असत्याला वेगळं करून सत्याला छातीठोकपणे स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये हिम्मत निर्माण करतं ते शिक्षण होय. मग आजच्या स्रियांनी नेमकं कोणतं शिक्षण घेतलं? खेदाने असे म्हणावे लागते की,आम्ही सदाशिव पेठेतलं शिक्षण घेतलं. जर आम्ही ज्योती-सावित्रीच्या गंजपेठेतलं शिक्षण घेतलं असतं, तर आम्ही फार चांगल्या प्रकारे सुशिक्षित झालो असतो. स्रिया जोपर्यंत ख-याअर्थाने शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत, सृर्जनशील बनत नाहीत, तोपर्यंत स्रियांची ओळख निर्माण होऊ शकणार नाही असे मला वाटते.

स्त्रियांच्या पोषाखावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा संस्कारांचा पाया मजबूत असेल, तर जास्त चांगलं.स्त्री आणि पुरूष ही जर समाजाची दोन अंगं असली तर एका अंगाला कायम दुय्यम वागणूक मिळावी आणि त्याचे निर्णय कायम दुसर्‍या अंगाने घ्यावेत हा न्याय असू शकत नाहीत. अशा दुटप्पी वागण्याला धर्म, संस्कृतीची जोड देणं... मग तो कुठलाही धर्म आणि संस्कृती असो... मला चुकीचं वाटतं.

निसर्गाने स्त्री-पुरूषांना भिन्न जबाबदार्‍या वाटून दिलेल्या आहेत. माणूस जसजसा विकास करत गेला, तसतसा त्याने परंपरा, धर्म, संस्कृती या सगळ्यांमधून आपल्या जीवनाला आकार देण्यास सुरूवात केली पण याचा अर्थ असा नव्हे की, ती रेखाटलेली रांगोळी तशीच अबाधित ठेवण्याचं कर्तव्य फक्त स्त्रीच असतं आणि पुरूष केव्हाही ते सर्व लाथाडून त्याचा दोष स्त्रीच्या माथी मारू शकतो.

पण मला वाटतं, चूक इथेही स्त्रियांचीच असावी. आपण जन्माला घातलेल्या पुरुष बाळाचा पुरूषी गंड कुरवाळण्यापेक्षा आपल्या व परक्याच्या घरातील माता-भगिनिंना सन्मानाने कसे वागवावे, हे त्याला स्त्रीने शिकवायला हवे होते. इथे देखील आपण पुरूषाने स्पर्म देण्यापलिकडे मुलासाठी त्याचं काही योगदान असावं हे गृहीतच धरत नाही. मग प्रश्न असा पडतो की, दुसर्‍याचं नाव लावून, त्याच्या नातेवाईकांना सांभाळत, त्याच्या घराच्या परंपरा पाळत, त्याची मुलं जन्माला घालण्यासाठी स्त्रीने लग्न का करावं?

आपल्या देशामध्ये लग्न हा केवळ एक संस्कार नाही, तर ती एक संस्था आहे. याचा अर्थ कृपया समजून घ्या. अजूनही ह्या संस्थेची पाळंमुळं मजबूत आहेत ती स्त्रीमुळे. एकदा का स्त्रियांनी लग्न हा संस्कार पूर्णपणे नाकारून मूल जन्माला घालणं इतपतच पुरूषाची मदत घेतली तर हे गाऊन, मॅक्सी, साडी किंवा आणखी काही.. स्त्रियांनी काय घालावं आणि काय नाही, हे सांगण्याचा अधिकारच पुरूष पूर्णपणे गमावून बसणार आहेत.

स्वत:ला अलिखित, अबाधित स्वातंत्र्य ठेवून घेताना पुरूषाने हा विचार केला नाही की, स्त्रियांवर लादलेल्या बंधनांची हीच पराकाष्ठा एक दिवस बंडाला कारणीभूत ठरेल. आज स्त्रिया आधुनिक कपडे घालताना दिसतात, ते पुरूषांना आकर्षित करून घेण्यासाठी नव्हे, तर आपण मुक्त आहोत हे स्वत:चं स्वत:ला पटवून देण्यासाठी. स्त्रीला वागण्या-बोलण्याचं, कपडे-परंपरांचं भान देताना पुरूष मात्र अपशब्द वापरतानादेखील दुसर्‍याच्या आई-बहिणीचा उद्धार करतो. हे कुठल्या संस्कारांमध्ये बसतं?

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली